
📍 सोलापूर
आज सोलापूरमधील विडी कामगार भगिनी तसेच विडी कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मजुरी दराबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. सध्या दर हजार विड्यांसाठी ₹२४५ मजुरी दिली जात आहे. शासनाने हा दर ₹३७९ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामगार संघटना आणि कारखानदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
मात्र, प्रत्यक्ष कामगार भगिनींशी संवाद साधल्यानंतर एक महत्त्वाची बाब समोर आली. कामगारांना मजुरीपेक्षा त्यांचा रोजगार आणि कारखाने सुरू राहणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. कारखाने बंद पडले किंवा इतरत्र गेले, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होईल, अशी त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे, कारखानदारांनीही वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे ₹३७९ मजुरी देणे सध्या शक्य नसल्याचे सांगितले. इतर राज्यांतील विड्यांशी स्पर्धा करताना उत्पादन खर्च वाढल्यास उद्योग अडचणीत येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

म्हणूनच हा विषय केवळ मजुरी वाढीचा नाही; तर हजारो कामगारांचा रोजगार, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि सोलापूरच्या विडी उद्योगाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. कामगार संघटनेची भूमिका कामगारांच्या हिताची आहे, याचा आदर आहे; मात्र प्रत्यक्ष कामगार आणि कारखानदारांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या सर्व बाजूंचा विचार करून कामगारांचा रोजगार सुरक्षित राहील आणि उद्योगही टिकून राहील, असा व्यवहार्य मार्ग काढणे गरजेचे आहे.
या संदर्भात विडी कामगार प्रतिनिधी आणि कारखानदारांशी पुढील चर्चा करून मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच संबंधित मंत्री महोदयांची भेट घेऊन सोलापूरमधील प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. रोजगार टिकवणे, कारखाने सुरू ठेवणे आणि सोलापूरच्या विडी उद्योगाचे भवितव्य सुरक्षित करणे, यासाठी योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
#विडी_कामगार #Solapur #विडी_उद्योग #कामगार_हित #BJP4Maharashtra