
—————-
विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत आणि ‘वृत्तपत्र लेखक दिन’ उत्साहात साजरा…
——————
. सोलापूर दि. २२ – “आजचे युग जरी विज्ञानाचे असले तरी भारतीय संस्कृती हीच आपली खरी रक्षक आहे. आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच सामाजिक ज्ञानाचे वाचन व लेखन केले पाहिजे. कथामाला आणि वृत्तपत्र लेखक मंचाचे कार्य अत्यंत आदर्श असून इतरांनीही याचा आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी केले.

. अ. भा. साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर आणि सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक मदत वाटप आणि ‘वृत्तपत्र लेखक दिन’ सोहळा समाज कल्याण केंद्र, सोलापूर येथे मोठ्या थाटात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती गायकवाड हे होते.

. कार्यक्रमाची सुरुवात अरुण धुमाळ यांनी सादर केलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करताना कथामालेच्या अध्यक्षा आरती काळे यांनी कथामालेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. तर लेखक मंचाचे अध्यक्ष फैय्याज शेख यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना वृत्तपत्र लिखाणाचे महत्त्व सांगून त्यांना व्यक्त होण्याचे आवाहन केले.
. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपयांची शैक्षणिक मदत सुपूर्द करण्यात आली. या मदतपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन प्रा. अशोक म्हमाणे यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय कार्याध्यक्ष रामकृष्ण अघोर यांनी करून दिला.

अध्यक्षीय भाषणात निवृत्ती गायकवाड यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास कथामाला व लेखक मंचाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र धर्मसाले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीवल्लभ करकमकर यांनी मानले. कार्यक्रमास अशोक खानापुरे, सुनील पुजारी,विठ्ठल वठारे, मल्लिनाथ किणगी प्रा. अशोक म्हमाणे,रंगसिद्ध दसाडे.प्रेमचंद मेने, प्रांजली
मोहिकर, अनुराधा निकम इ. सदस्य उपस्थित होते.
