
.सोलापूर विशेषवृत्तांत निलेश डांगे:- सोलापूर महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी
सोलापूर महानगरपालिकेच्या समोर शारदा देवीच्या पूर्णाकृती मूर्तीच्या परिसरात जैन कारंजे बसविण्यात आले आहे. मात्र, कारंजे परिसरातील फरशीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फरशीचे मोठे स्लॅब जागेवरून हलले असून काही ठिकाणी फरशी उखडलेली आहे. काही भागात चक्क मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला अवघे काही तास शिल्लक असताना महापालिकेच्या अगदी समोरील परिसराची ही अवस्था नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका परिसरात नागरिकांची, अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच विविध मान्यवरांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी परिसरातील फरशीची दुरुस्ती न झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

फरशीखालील भाग उघडा पडल्याने पादचाऱ्यांचा पाय अडकण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो. काही फरशीचे तुकडे बाजूला पडले असून, परिसरातील दगडही अस्ताव्यस्त दिसत आहेत.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे केली जात असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोरीलच परिसराची अशी अवस्था का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेबाबत प्रशासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून उखडलेल्या व धोकादायक फरशीची दुरुस्ती करावी. तसेच कारंजे व परिसराची स्वच्छता करून नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.