
मोडके दरवाजे, तुटलेल्या खिडक्या, गळके छत; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…
प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात नव्या एसटी बसेस दाखल झाल्याने प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक मार्गांवर आजही जुन्या, जीर्ण आणि नादुरुस्त बसेसच धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
द
अनेक बसांचे दरवाजे मोडकळीस आलेले असून, काही बसांच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. पावसाळ्यात छत गळत असल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना पावसाचे पाणी अंगावर सहन करत प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बसमधील आसनांचीही दुरवस्था झालेली असून, स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, नव्या बसेस आगारात दाखल झाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी त्या सर्व मार्गांवर उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील प्रवाशांना विशेषतः जुन्या आणि वारंवार बिघाड होणाऱ्या बसमधूनच प्रवास करावा लागत असल्याची तक्रार आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा नादुरुस्त बसमुळे केवळ प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत नाही, तर अपघाताचा धोकाही वाढतो. मोडके दरवाजे, तुटलेल्या खिडक्या आणि तांत्रिक दोष यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाने तातडीने नादुरुस्त बसेस दुरुस्त करून सुरक्षित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच नव्या बसेसचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी केली आहे.
– लोक सम्राट न्यूज नेटवर्क”